लॉकडाऊन नंतर अनेक मालिकांमध्ये चढउतार आले. काही महिने मालिकांचे शूटिंग थांबण्यात आले. त्यानंतर काही जुन्या मालिका बंद झाल्या, तर काही मालिका सुरु राहण्यासाठी मालिकांमधील काही कलाकार बदलण्यात आले, तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. झी मराठी वरील मालिकांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. मालिकांचा नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. सध्या झी मराठी वाहिनीवर २ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत. दोन्ही मालिका खूपच वेगळ्या विषयावर आधारित आहेत. नवीन वर्षात ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका सुरु होत आहे. हि मालिका ४ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले आणि ‘गर्ल्स’ चित्रपट फेम अभिनेत्री अन्विता फलटणकर मुख्य भूमिका साकारत आहेत. आणि दुसरी मालिका ‘काय घडलं त्या रात्री’ हि ३१ डिसेम्बरपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार. ह्या मालिकेत मानसी साळवी, सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, जयंत वाडकर ह्यासारखे लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेच्या प्रसारणाची वेळ रात्री ८ वाजता प्रसारित होणार असल्यामुळे अनेकांना वाटले होते कि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि मालिका बंद होणार. कारण ह्या मालिकेच्या प्रसरणाची वेळ सुद्धा रात्री ८ ची आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार ‘तुझ्यात जीव रंगला’ हि लोकप्रिय मालिका बंद होऊन त्या मालिकेच्या वेळेवर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि मालिका प्रसारित होणार आहे. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी आलेल्या ह्या मालिकेने तब्बल ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिकेत कोल्हापुरी भाषेचा तडका असल्यामुळे मालिका खूपच गाजली होती. ह्या मालिकेतून राणा आणि अंजली हि जोडी घराघरांत पोहोचली. ह्या मालिकेला गेली ४ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मालिकेत जुनी नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावर हिच्या जागी नवीन नंदिता वहिनी अभिनेत्री माधुरी पवार हिची एंट्री झाल्यामुळे मालिकेची चांगलीच चर्चा झाली होती. माधुरीच्या अभिनय आणि भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या समिंश्र प्रत्रिक्रिया मिळत आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या झी मराठी वाहिनीवरील नजीकच्या काळातील सर्वात लोकप्रिय मालिकांमधील एक आहेत. परंतु प्रेक्षकांचा नेहमीच नव्या गोष्टींकडे कल असतो. त्यामुळे झी मराठी वाहिनीवर आता दोन नवीन मालिका येत असल्यामुळे झी मराठी वाहिनीचा टीआरपी वाढण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही नवीन मालिकेत लोकप्रिय कलाकार असल्यामुळे ह्या मालिका सुद्धा लवकरच लोकप्रिय ठरतील, ह्यात शंका नाही. ‘तुझ्यात जीव रंगला’ हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असून आता मालिकेतील कथानक कोणत्या गोष्टीवर येऊन संपते, हे पाहणे देखील मनोरंजक ठरेल.
असं असलं तरी तुम्हांला खरंच वाटतं का तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय मालिका बंद व्हावी. किंवा त्या जागी झी मराठी वरील कोणती मालिका बंद व्हायला हवी, तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि झी मराठीवर सुरु होणाऱ्या ह्या दोन्ही नवीन मालिकांना मराठी गप्पातर्फे खूप खूप शुभेच्छा. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्यामुळे तुम्हां सर्वांचे मनापासून आभार.